धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील प्रसिद्ध कवयित्री माझी मैत्रीण सौ अनुराधा रत्नाकर उपासे तालुका तुळजापूर मु.पो.मंगरूळ यांचा बहर नावाचा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला आणि वाचताना कांही क्षणासाठी स्वतःला विसरून गेले कवयित्री सायन्स ची विद्यार्थिनी असूनही मराठी भाषेची गोडी अवीट आहे. मातृभाषेचा गोडवा मराठीची, माया अपार दिसून येते भाषेतील माधुरी शब्दसौंदर्याने खचाखच भरलेला काव्यसंग्रह म्हणजे बहर.
बहर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर येथील प्रकाशक श्री प्रवीण भाकरे यांनी प्रकाशित केले असून याची प्रथम आवृत्ती २३ एप्रिल 2022 (95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर, लातूर )येथे प्रकाशित केले असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये असले तरी आपल्या सर्वच कविता मानवी मनाला स्पर्श करून जाणा- आहेत. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ सुदर्शन बारा पात्रे यांनी अतिशय सुंदर नावाला साजेशी असे रेखाटले आहे मुखपृष्ठावर गुलाबी रंगाच्या फुलांचा भर असलेले मुखपृष्ठ वाचकांच्या मनाला पालवी फोडणारे आहे.
माझं भाग्यच सासर
सासू आहे जशी माय
सुख देणारा गं धनी
आणि हवे तरी काय...
वाडा जरी जुना तरी
वृक्षवेली भरपूर
मिळेल शुद्ध हवा अशी
प्राणवायू पुरेपूर....
कवयित्री अनुराधा उपासे यांनी वरील ओळीमध्ये सुंदर अष्टाक्षरीमध्ये सासरचे गोड कौतुक केलेले आहे. सासर हेच माझं भाग्य. सासू म्हणजे दुसरी आईच असते. आजकाल सासू-सासर्यांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या बायकांच्या थोबाडावर जबरदस्त चपराक बसावी असे अंतर्मनाला भिडणारे शब्द आजच्या काळातील कवयित्री अनुराधा उपासे यांनी आपल्या कवितेतून मांडले आहे. आणखीन मला काही नको या शब्दांमधून कवयित्रीच्या मनाचा उदारपणा या ठिकाणी दिसून येतो आजकालच्या काळातील बहुतांश सुना मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली की शहराच्या ठिकाणी जाऊन आलिशान बंगले बांधून आई-वडिलांपासून कोसो दूर जाऊन राहतात. त्यांना माहिती असतं की आई-वडीलच काय त्यांचं गाव सोडून शहरात राहायला येत नाहीत. आई-वडिलांना सांभाळायचं काय हवं नको? ते पाहायचं कामच नाही पण याचं काळातील कवयित्री अनुराधा उपासने या शिक्षिका असूनही आपल्या गावाकडील मातीशी घट्ट नाळ जोडून, सासू-सासर्यांची सेवा करतात आणि जुन्यात वाड्यात राहतात. उलट त्या म्हणतात वाडा जरी जुना तरी वृक्षवेली भरपूर मिळेल शुद्ध हवा अशी प्राणवायू पुरेपूर गावी भरपूर प्रमाणात वृक्ष असतात त्यामुळे शुद्ध हवा ग्रामीण भागात पुरेपूर मिळते त्यावरील ओळीवरून कवयित्रीला निसर्गाची जाण असल्याचे व वृक्षवेलीवरचे प्रेम दिसून येते
वेळप्रसंगी बन भाऊराया
माझा तू पाठीराखा
जसा तारण्यास द्रोपतीला
धावला श्रीकृष्ण सखा...!!
महाभारतामध्ये द्रोपतीचे वस्त्रहरण झाले होते तेंव्हा द्रोपतीची अब्रू राखण्यासाठी श्रीकृष्ण धावून गेले आणि द्रोपतीची अब्रू वाचवली. अगदी त्याचप्रमाणे माझ्या बंधुराया तू सुद्धा माझ्या वेळ प्रसंगी धावून ये.माझा पाठीराखा हो. असे संवेदनशील मनाच्या कवयित्री सौ.कवयित्री अनुराधा उपासे आहे वरील ओळीतून व्यक्त होताना दिसतात आजच्या काळात कोण कोणाचा भाऊ राहिला नाही. ना बहिणीचे तसे प्रेम राहिले नाही. वहिनी सुद्धा माहेरी हिस्सा टाकताना दिसतात आणि भाऊ सुद्धा बहिणीला साडीचोळी बांगड्या सण, उत्सवाला बहिणीला साडीचोळी करताना दिसत नाहीत.कशीतच असतीलही पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.भावा-बहिणींच्या नात्यांमध्ये स्वार्थ भरलेला दिसत आहे. भाऊ रक्षाबंधनाला बहिणीकडे जात नाही. बिचारी बहीण वाट बघत बसते.तिचे डोळे वाटेकडेच लागलेले असतात. पूर्वीच्या काळी माहेरवासीनी माहेरी पंचमीच्या सणाला बोलावून आणायचे ते रक्षाबंधन झाल्यावरच बहीण सासरी जायची. ती माया ती ओढ ,ते प्रेम आजच्या काळात राहिलेले नाही हे वास्तव आहे संवेदनशील मनाच्या कवयित्री इथे भाऊ होताना दिसतात व भावासाठी जगातील सर्व सुखदेवाकडे मागतात इतकेच नाही तर माझ्या आई-बाबांना जप म्हणून काव्यातून सांगतात
कळी पाहता झाडावरची
मनात अनेक शंका येतात
काय माहीत कुणास ठाऊक
कळीची फुले कसे होतात?
सुगंध सुरेख मिळताच
दरवळ साऱ्या आसमंती
रहस्य फुलांच्या सुगंधाचे
जाणण्या झाली सुन्न मती...
निसर्गाचे अद्भुत चक्र माणसाला आजपर्यंत कळले नाही. जसा रात्री नंतर दिवस येतो.दिवसा मागून रात्र. जसे ऋतुचक्र बदलत राहते. पावसाळ्यानंतर हिवाळा. हिवाळ्यानंतर उन्हाळा असे वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येतात. वेगवेगळी फुले येतात. वेगवेगळ्या रानभाज्या येतात. तसेच झाडावरच्या कळीला पाहिल्यावर कवित्रीच्या मनामध्ये कुतुहल निर्माण होते. कळीचे फुल कसे होते? बियांचे कोंब कसे येतात ? त्यानंतर हिरवीगार कळी डोलते खरंच त्यात रंग कोण भरते? सुगंध कोण भरतो ? फुलांच्या सुगंधाच्या रहस्याने कवयित्रीची मती सुन्न झाली. आणि खरंच अख्या जगाला नवल वाटावं. कोड पडावं अशी निसर्गाची किमया आहे. वरील ओळीवरून कवयित्रीला निसर्गाची आवड व निरीक्षण, निसर्गाबद्दलची गोडी, प्रेम कळून येते.
सुजलाम सुफलाम
देश माझा किती छान
अनेक संत येथे जन्मले
मिळाले संस्कार महान
हा देश शूरवीरांचा
कीर्ती शौर्याची गाथा
जवानांनी अर्पिले प्राण
चरणी त्यांच्या माथा....
भारत देश हा सुजलाम् सुफलाम् आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या देशात अनेक संत जन्मले. अनेक थोर क्रांतीकारक जन्माला आले. आणि संतामुळे या देशाला चांगले संस्कार मिळाले. हा भारत देश शूरवीरांचा आहे. या देशाच्या संरक्षणासाठी किती जवानांनी हसत हसत आपल्या प्राणांचे आहुती दिली आहे. कित्येक जवान सैनिक देशासाठी शहीद झाले आहेत.कवयित्री अनुराधा उपासे या सर्व भारतीयांच्या चरणी नतमस्तक होऊ पाहत आहेत.
ये ग ये ग ननंद बाई
झाली मला बाई घाई
दोघी मिळून जात्यावर
ओवी गात दळण दळून...
हा बहाणा ग दळणाचा
सुख दुःख सांगायचा
वेळ मिळेल बोलायला
ओव्यातून गाण्याचा....
ओवी हा एक गेय प्रकार व आपण लक्ष लयीत जाऊ शकतो पूर्वीच्या काही सुमधुर आवाजात स्त्रिया पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळताना गायीच्या आज जात्यावरची दळण राहिली नाही ना ओव्या राहिल्या आहेत सर्व जागा यंत्रांनी घेतली आणि मानवाचे शारीरिक श्रम कमी झाले. तसे पुर्वीचे लोकं शंभरी गाठायचे पण कमी झाले. लोक अल्पायुषी झाले. ओवी मधून संसाराचे सुखदुःख गायले जायचे. ओळीच्या माध्यमातून बायकांचे मनमोकळे व्हायचे. कवयित्री अनुराधाताईंना आजही ओव्या रचता येतात. वरील ओवी मध्ये कवयित्री आपल्या नंदेला दोघी मिळून जात्यावर ओळी दादासाठी आवाज देतात दळण तर हा बहाना आहे. ओवी गाता गाता सुखदुःख सांगायचं तेवढाच बोलायला वेळ मिळे. ओव्याच्या गाण्यातून अशा अनेक ओव्या मधून घरातील वडीलधारी मंडळीची खुशाली पूर्वीच्या बायका सांगत असत. आजच्या काळात बोलण्याची अनेक साधने निघाली पण संवाद मात्र कमी झाला. सुविधा अनेक निघाल्या पण जिव्हाळा आपुलकी कमी झाली हे आजच्या काळातली भयान्वस्त आहे.
कवयित्री अनुराधा उपासे यांच्या अनेक कविता काळजाला हात घालणा-या आहेत. त्यांच्या बहर या काव्यसंग्रहात अनेक सुंदर सुंदर कवितांचा बहर आला आहे. हे काव्यसंग्रह वाचताना जाणवते. शेतकऱ्याबद्दलचे प्रेम, आपुलकी, नात्यांचा गोतावळा,देशप्रेम, बंधुता बेरोजगारीचे जीवन, निसर्ग, जिजाऊ माँसाहेब , अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले,अनाथांची माय- सिंधुताई अशा सर्व गुणसंपन्न नारीचा गुणगान गाणाऱ्या कविता वाचकाला चौफेर एखाद्या बगीचा मध्ये फिरवून आणल्यासारखे वाटतात. बहर हा काव्यसंग्रह मनाणाला उभारी तर देणारा आहेस पण बलिदानासारख्या कवितेतून आत्मचिंतन करायला लावणार आहे.प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे बहर.... कवयित्री सो अनुराधा उपासना यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
समीक्षिका/ शिक्षिका /लेखिका/ कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका जिल्हा वाशिम
पीन - 444505
मोबाईल 9767663257
No comments:
Post a Comment