मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, April 13, 2026

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन 

उपक्रमशील व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या ५ व्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्याला शिवाजी हायस्कूल वाशिम येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.वत्सगुल्मी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे सरांची लाभली आहे तर पाठराखण प्रसिद्ध लेखक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मा.एकनाथ आव्हाड सर यांनी केली आहे.
      मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे यांचे यापुर्वीचे साहित्य म्हणजे त्यांचा पहिला काव्यसंग्रह चिमणी पाखरं,तसेच सुकळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कवितांचा बालकवितासंग्रह -उमलती फुले,(महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला काव्यसंग्रह व पहिले बालकविसंमेलन मिनाक्षी नागराळे यांनी सर्किट हाऊस वाशिम येथे घेतले होते.तिसरे पुस्तक म्हणजे 'स्वराज्याचे मावळे' हा पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांवर झाला.त्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास कवितेच्या रूपात मांडण्यात आला.याच स्वराज्याचे मावळे या काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुंबई येथील ग्रंथालयात निवड झाली तसेच महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली.या आगळ्यावेगळ्या काव्यसंग्रहाचे साहित्यप्रेमीनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर लॉकडाऊन काळात महाराष्ट्रभरातून पुस्तके समिक्षणासाठी भेट येत असतं त्या पुस्तकावरचे समिक्षण करून त्याचा समकालीन समिक्षा ग्रंथ निर्माण झाला.या ग्रंथाचा उपयोग पिएचडी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे.
              शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक तालुक्यातून कवितेसाठी तीन नंबर काढण्यात आले होते.ते शिक्षक तालुक्यातून  विभाग स्तरासाठी पात्र ठरले होते.त्या निवडक कवितांचा पाच जिल्ह्यांतील शिक्षकांच्या स्पर्धा या वाशिम जिल्ह्यात घेण्यात आल्या त्यामुळे या काव्यसंग्रहाला वत्सगुल्मी हे नांव देण्यात आले.
वाशिम जिल्ह्याला साहित्यिक वारसा राजा वाकाटक ते वत्सगुल्मीच्या काळापासूनचा असल्याने आणि वत्सगुल्मी ही एक साहित्यशैली असल्याने वाशिमचे जुने नांव वत्सगुल्म असल्याने या काव्यसंग्रहाला कवयित्री /लेखिका,समिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी खूप विचारपूर्वक दिले आहे.
     मिनाक्षी नागराळे यांना सावित्रीमाई फुले कवयित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने २०२३/२४ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मध्ये जिल्हास्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आजपर्यंत मिनाक्षी नागराळे यांना ९१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९२,व ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेची निवड झाली होती.मिनाक्षी नागराळे यांना साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक,कार्यासाठी आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षकी पेक्षात तर अग्रेसर असणाऱ्या तळागाळातील गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाचा लळा लावणा-या या ध्येयवेड्या शिक्षिकेला उद्याच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या हार्दिक शुभेच्छा.... खूप खूप अभिनंदन

Wednesday, April 1, 2026

१३) केल रशियन भाजी (आयुर्वेदिक कविता)

 १३) केल रशियन भाजी(आयुर्वेदिक कविता)

ही एक रशियन भाजी 
केल तिचे नाव आहे 
त्यात कोणकोणते पौष्टिक घटक 
मिनू त्याचा संदर्भ पाहे....!!

विटामिन ए विटामिन सी 
 विटामिन के व कॅल्शियम असे भरपूर 
पोटॅशियम व मॅग्नेशियम 
 आणि काय ब्रोहाइड्रेट्सचे प्रमाण पुरेपूर ...!!

हृदयासाठी खूप फायदेशीर 
भरपूर असतो फायबर 
कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि 
आटोक्यात ठेवतो ब्लडप्रेशर ....!!

अँटिऑक्सिडेंट्स मुळे 
फॅट होते कमीत कमी 
जुने आजार पळून जातील 
मिळेल  निरोगी शरीराची हमी....!!

 भरपूर कॅल्शियममुळे 
हाडे होतात खूप मजबूत 
कॅन्सर पासून बचाव होतो 
केल जणू आरोग्याचा दूत....!!

 रोगप्रतिकारशक्ती वाढवते 
विटामिन ए मुळे सुधारते डोळ्यांची दृष्टी 
आयुर्वेदाचा खजिना अमाप आणि 
औषधी गुणांनी युक्त भरली सृष्टी.....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक 
शाळा जांभरून नावजी

चिमणी दिनानिमित्त कविता (२२ मार्च २०२६)

 चिमणी दिनानिमित्त कविता ( २२ मार्च २०२६)

येता चिवचिव करी
डोळे इवले इवले 
देह सानुला सानुला 
चिमुकली ती पाऊले....

लुकलुक मान हले 
चिमणी दारात येते
टिपुणीया सारे दाणे 
उडूनिया मग जाते.....

इवलासा जीव तिचा
होई कासावीस सदा
पाहुणी जणू तीच
तीची वेगळी ती अदा....

ठेवा येळणीत पाणी 
बांधा झाडाला येळण 
थंडगार सावलीत 
दाणे टिपत खेळणं....!!

इवलाश्या गे चोचीत 
घेई इवलासा घास 
टकमक पहातसे 
कुणी आहे आसपास?

दाणे टिपाया येईल 
आला कडक उन्हाळा
तिचा व्याकुळला जीव
कधी येई पावसाळा....

खरकटे नाही दारी
घेती बंगल्याने जागा
चिमणी दिनानिमित्त 
जबाबदारीने वागा......

चिमणी दिनानिमित्त 
सा-यांना शुभेच्छा 
इवलासा जिवाची रे 
पूर्व कर सा-या इच्छा

कवयित्री 
मिनाक्षी नागराळे मॅडम वाशिम

१२) बहुगुणी बेलपत्र (आयुर्वेदिक कविता)

 १२)  बहुगुणी बेलपत्र   (आयुर्वेदिक कविता)

बहुगुणी बेलपत्र 
आयुर्वेदामध्ये महत्त्व फार
बेलाचे पानांच्या खाण्याने 
बरेच कमी होतात विकार....!!

पचनसंस्था सुधारते 
कमी होतो अतिसार 
बद्धकोष्ठता दूर करी 
कमी होईल मधुमेहाचे आजार ....!!

मधुमेहावरचा रामबाण उपाय 
वाढते रोगप्रतिकारक शक्ती 
बेलपत्राच्या पूजनाने मग 
वाढेल महादेवाची भक्ती ......!!

शिवाला अत्यंत प्रिय असे 
धार्मिक पूजेमध्येही तितकेच महत्त्व 
बेलपत्रामुळे शरीराला ऊर्जा मिळे
कफ, वात दूर करे बेलाचे सत्व....!! 

तीन पानांचे बेल हे 
औषधी गुणांची खाण
उन्हाळ्यात तहान शमवी
महादेवाच्या पूजेला सर्वात आधी मान...!!

बेलपत्राच्या सरबताने  बघा
उन्हाळ्यात पोटास मिळे थंडावा 
मुळव्याधीमध्ये आराम मिळतो 
असे गुणकारी बेलाचे झाड लावा....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
🏫 जांभरून नावजी

Monday, March 16, 2026

११) पळस (आयुर्वेदिक कविता)

 ११) पळस (आयुर्वेदिक कविता)

पळसाला पाने तीनच 
म्हण जरी आहे खरी 
पण पळसाच्या पाने, फुले, सालीने 
होतात कित्येक रोग बरी ....!!

पळसांच्या बियांच्या वापराने 
मरून जातात पोटातील जंत 
मधुमेहावर नियंत्रण करते अन् 
त्वचारोग बरा करून कमी करी संधिवात...!!

 खरुज, गजकर्ण, खाज 
करी त्वचा विकार दूर 
पचनसंस्था सुधारते अन्
पोटातील जळजळ होते भूर्रर....!!

पळसांच्या पानांच्या लेपाने 
सांधेवात आणि सूज होते कमी 
पळसावरील डिंक सेवनाने 
महिलांना मासिक पाळीची हमी ....!!

कडक उन्हाळ्यात ही बघा 
 डौलाने फुलतो पळस 
नैसर्गिक रंग बनते फुलापासून 
फक्त बनवायला नका करू आळस...!!

ओसाड माळरानी पळस फुलतो
भुरळ घालतो मानवी मनाला
धैर्याने सामोरे जावे माणसाने 
जणू ओरडून सांगतो जनाला....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
जांभरून नावजी, वाशिम 

Saturday, March 7, 2026

मानवी मनाला अस्वस्थ करून वाचनाचा वेग वाढवणारी कादंबरी म्हणजे - काडीमोडातील काटे होय.

 मानवी मनाला अस्वस्थ करून वाचनाचा वेग वाढवणारी कादंबरी म्हणजे -काडीमोडातील काटे 

       विदर्भातले वाशिम जिल्ह्यातील बोरखडी गावचे हल्ली छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक भ. पु. कालवे सर यांची पहिली कादंबरी 'घट रिकामा'  वाचल्यानंतर पुढील कादंबरी वाचनाची उत्सुकता वाचनाचा वेग वाढवणारी प्रतीक्षेत असलेली 'काडीमोडातील काटे' ही दुसरी कादंबरी नुकतीच वाचनात आली. घट रिकामा या कादंबरीचा दुसरा भाग म्हणजे 'काडीमोडातील काटे' ही कादंबरी होय. एका सरळ मार्गे प्राध्यापक असलेल्या शिक्षकाला जीवन जगताना त्यांचा संघर्ष, होणारी ससेहोलपट, चारचौघात जीवन जगताना येणारी आव्हाने, प्रत्येक आव्हानांना तोंड देताना मेताकुटीला येणारा जीव, नोकरी करणाऱ्यांचे कसे हाल होतात? समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, मित्रांनी दिलेली साथ आणि आपल्याच  नातेवाईकांनी केलेला घात या सगळ्यांची उकल करणारी, वाचनाचा वेग वाढवणारी व मानवी जीवनाला अस्वस्थ करून विचार करायला लावणारी कादंबरी म्हणजे  'काडीमोडातील काटे'  होय.
           प्राध्यापक अशोक व त्याची बायको उर्मिला यांच्या संसाराचा न बसलेला ताळमेळ, परिस्थितीशी दोन हात न करण्याचा अट्टाहास, आपापल्या पात्रामध्ये ठामेठोकपणे राहणारी पात्र, समयाशी जुळवा जुळव न करता येणारं जोडपं, त्यामध्ये त्या चिमुकल्या बाळाची होणारी परवड वाचताना माणूस म्हणून विलक्षण अस्वस्थ होतो. 
          काडीमोडातील काटे वाचताना अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत. वाचकाची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत टिकून राहते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्राध्यापक अशोक यांना सात वर्षात ९ वेळा घरं बदलावी लागतात. त्यामुळे वैतागून गेलेला अशोक शेवटी स्वतःच्या घरासाठी पैशाची जुळवाजुळ करून शेवटी स्वतःच्या घरात राहायला जातो. त्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते पण नवीन घरांमध्ये सुद्धा अशोक व उर्मिलाचे वाद  कांहीं थांबत नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांचे रोज वाद होत. कित्येक वेळा ते वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे प्राध्यापक आशोकने उर्मिला पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जुडीसीएल सेपरेशन साठी अॅड . विजय मोठे यांच्याकडे जाऊन घटस्फोटाची केस दाखल करतात त्यामुळे आयुष्याचा एवढा मोठा निर्णय प्राध्यापक आशोक घेताना एखाद्या अग्नि कुंडात होरपळल्यासारखा अनुभव घेतात. छोट्या बाल सुकन्येला सोडून जाताना एका बापाची होणारी तळमळ या कादंबरीतून दिसून येते. नवरा बायकोच्या संसारी घरगुती भांडणाची ही झालेली सुरुवात शेवटी कोर्टकचेरीत पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामध्ये उर्मिलाचे बाळाला बाथरूम मध्ये कोंडणे, घटस्फोट नको म्हणून अंगावर रॉकेल ओतून घेणं, सतत घरात भांडण करणं आणि दोघांनीही पोटच्या गोळ्याचा म्हणजे त्या चिमुकलीचा विचार न करणं हे सगळं आधाशा सारखं वाटतं. एक माणूस म्हणून विचार न करणारे हे जोडपं वाचकाला मात्र नक्कीच विचार करायला लावतो. 
     चार भिंतीच्या आतलं भांडण हे कोर्टात गेलं होतं. उर्मिला आणि अशोकच भांडण खूप पुढे गेलं होतं. त्यांना कशाचीही तमा राहिली नव्हती. राजाराणीसारखं  सुखाचा संसार करणारे पती-पत्नीचे प्रेम नावालाही शिल्लक राहिले नव्हतं. अशा परिस्थितीमध्येही अशोकला आशा होती की आपण एकदा उर्मिलाचा पिच्छाच सोडून टाकावा आता एकत्र राहण्यात मज्जा नाही. मनाने दुभंगलेली ही दोन जीवं तिसऱ्या जीवाचा पण विचार करायला तयार होत नव्हती. शिक्षकी पेशातल्या प्राध्यापकाला इतक्या कोर्टकचेऱ्या, कोणत्या नातेवाईकाची करावी लागली विनंती, झालेला त्रास, लागलेला पैसा आणि वाया गेलेला वेळ व वाढलेला डोक्याचा ताण अगदी मन विषन्न करतं या संपूर्ण प्रक्रियेत काडीमोड करण्यासाठी मनाभावापासून सामील असणारे दुलंगे सर, चिंचाणे सर , डॉक्टर श्रीधर हिंगे, तहसीलदार पाटील साहेब, सरपंच शामरा गावंडे, ए.पी.आय वाळवे, कॉन्स्टेबल साखळे, अॅडवोकेट गवशे, अॅडवोकेट रावराणे, अॅडवोकेट लाखोबा लोखंडे, साखळी अॅडव्होकेट गवशे ,  अॅंडवोकेट रावराणे, अॅडवोकेट पाल्हेटकर , अॅडवोकेट हातने , एएसआय खानापुरे, इंजिनियर कोराने साहेब , अॅडव्होकेट ट आर्वीकर, अॅवोकेट देव उमरखेडकर , अॅडव्होकेट.केट बारणे, एडवोकेट गजाणे तसेच उर्मिलाची वडील आणि उर्मिलाची मैत्रीण राज्यांमध्ये हावरे हे सर्व यामध्ये प्रमुख भूमिका निभावतात या सगळ्या प्रकारात अशोकला फाडून खाणारे पोलीस , प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जण पैसेच मागत होता. कुत्र्यांना एक एक तुकडा टाकावा तसं प्रत्येक पोलिसांना वेगळे पैसे आणि वकिलांची वेगळी फेज त्यामध्ये होणारा मनस्ताप यानेच अशोक चक्राहून गेला होता . कधी एकदा काडीमोड होईल यास प्रतिक्षित राहणारा अशोक फार उदासीन होता या सगळ्या तानात पोलिसांनी मागितलेली पार्टी टेबलाखालून मागितलेली रक्कम आणि पावलो पावलाला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी लुबडणारे पोलीस आणि वकील यांच्यामध्ये हतबल झालेला अशोक मात्र हरवून गेला होता. 
          एकंदरीत शिक्षकेपेक्षा असणाऱ्या अशोकला जेवढी सुज्ञ, सुशिक्षित , सुसंस्कारित पत्नी मिळायला हवी होती ती मिळालीच नाही.गुण सुरुवातीला उर्मिलाने दिलेल्या चार कवितेमुळे अशोकला समजल्यास नाहीत म्हणून कुणाच्या कवितेवरून त्याची मूळता विचार सुसंस्करित असतीलच असे नाही काडीमोडातील काटे या कादंबरीला असेच इतका गहन प्राध्यापक व पुकालवे यांनी मांडला आहे की शेवटी काय झालं असेल अशी उत्सुकता वाचकाला लागून राहते त्यामुळे कादंबरीवर वाचनाचा वेग आपोआप वाढल्याशिवाय राहत नाही . शेवटी गाडी मोडं  होऊन नकारात्मक तिकडेच कडून सकारात्मक तिकडे भरपूर कालवे यांनी हा प्रवास अगदी सोयीस्कर रित्या आपल्या लेखन शैलीने या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे प्रत्येक वाचकाला अतुन अस्वस्थ करणारे, कादंबरी वाचकाला वेड लावते सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच ही कादंबरी प्राध्यापक भ.पु. कालवे यांना 
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 

कादंबरी - काडीमोडातील काटे 
लेखक -भ. पु. कालवे 
प्रकाशक- उत्कर्ष प्रकाशन 
पहिली आवृत्ती ३ नोव्हेंबर 2024 
पुस्तक मागविण्यासाठी फोन नंबर- 7263975516 


समीक्षिका लेखिका शिक्षिका कवयित्री 
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
(महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने पुरस्कृत)
 तालुका जिल्हा वाशिम
Mob.- 9767663257

Thursday, March 5, 2026

पाखरांची भरे शाळा (अष्टाक्षरी)

 पाखरांची भरे शाळा ५/३/२०२६

नभी सूर्य येता वर
पाखरांची भरे शाळा 
चिव करत चिमणी
लाविते बाळास लळा....!!

दारी अंगणात बाई
खरकटे गे सांडले
एक एक कण घेई
जीव झाडाले टांगले....!!

दाणा चोचीत टिपते 
भरवी पिल्लांना घास 
माय आणील चोचीत
छोट्या पिल्लांना ती आस...!!

पंख येता गे पिल्लांना
होई जीव वरखाली 
बळ पंखात भरते 
आई खरी रखवाली....!!

पिल्लांसाठी जीव तिचा
त्याच घरट्यात राही
दाणे आणील चोचीत 
छोटी पिल्लं  वाट पाही....!!

ठेवा अंगणात पाणी 
टाका अंगणात दाणे 
चिमुकल्या पावलांनी 
सुरू पक्षाचे टिपणे....!!

एक घास रे काऊचा
एक घास रे चिऊचा 
हरवून गेले कसे 
बंगल्यात आज गाणे....!!

नाही अंगण राहिले 
नाही पक्ष्यांची ती गाणी
कुठे हरवली आज 
सांगा किलबिल वाणी?

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
 जांभरून नावजी, वाशिम 

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...