मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Wednesday, March 12, 2025

बालमनावर चांगले संस्कार पेरणारा कथासंग्रह म्हणजे -पॅडीची गोष्ट

 बालमनावर चांगले संस्कार पेरणारा कथासंग्रह म्हणजे पॅडीची गोष्ट

   ६ ते १४ वयोगटातील जे मुले असतात अशा मुलांवर जर चांगले संस्कार रूजवले तर पुढच्या शंभर वर्षापर्यंत ते चिरकाल टिकणारे असतात. जसे वाईट संस्कार माणसाला बिघडवल्याशिवाय राहत नाहीत तसे चांगले संस्कार माणसाला बिघडू देत नाहीत. योग्य वयात संस्कार रुजवणे फार महत्त्वाचे असते. अगदी एखाद्या कुंभाराप्रमाणे कच्च्या मातीच्या गोळ्यापासून कुंभार पक्की मडकी बनवतो अगदी तसेच बालकांचे कोवळ्या मनाच्या पाटीवर जे कोरले जाते ते चिरकाल टिकणारे असते. राजमाता जिजाऊ मॉं साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बालवयातच स्त्रियांचा सन्मान करायला लावणारे संस्कार पेरले होते म्हणून अख्या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले पण ते शत्रूच्या स्त्रीलाही आदराने वागवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एकमेव राजे ठरले म्हणून संस्कार ही अशी गोष्ट आहे ती योग्य वयातच करावे लागतात.
     बीड जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध लेखक श्री उमेश मोहिते सर यांचा नुकताच प्रकाशित झालेला कथासंग्रह 'पॅडीची गोष्ट' वाचनात आला. या कथासंग्रहातील सर्वच कथा प्रत्येक बालकांवर चांगल्या संस्काराचा लेप लावून बालकांच्या भावविश्वात घेऊन जातात.जणू त्या कथेत मी स्वतःच आहे की काय असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक कथा लहान मुलांना आपली आहे अशी वाटू लागते. शब्दांची जादू असलेले उमेश मोहिते सर यांच्या शब्दांमध्ये खरंच जादू आहे. 
         प्रॉमिस कथेतून वर्गाला अभ्यास करून पुढे न्यायचं त्यासाठी बाळूने केलेली धडपड खरंच वाखाणण्याजोगी आहे. अशी कथा प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गाचा वास्तव जपण्याचा संदेश देते. परीक्षा काळात अभ्यास किती महत्त्वाचा असतो?  हे नकळत सांगून जाते. बाळू सारखा हुशार मुलगा वर्गात असल्याने त्याच्या मित्राला बाळू बद्दल असलेली आपुलकी, माया,प्रेम दिसून येते. एका वर्षात बाळू सारखा अभ्यासू मुलगा सर्व घटक चाचण्यात पैकीच्या पैकी मार्क घेऊन सर्वांचा लाडका कसा होतो?  यावरून अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे बालकाला प्रॉमिस या कथेतून शिकवून जाते.
          येस फ्रेंड ही बालकथा बालकांच्या काळजाला भिडणारी आहे. सरांचा मार चुकवण्यासाठी मण्यांनी वर्गात बोललेलं खोटं  अन्याला सहन होत नाही. खोटे बोलणे हे पाप असतं असं म्हणत आणि याने मित्राची चूक मित्राच्या आईला सांगून पुन्हा खोटं बोलू नये मित्र म्हणून याची चाललेली धडपड खरंच कौतुकास्पदच आहे. लहान मुलांना समजत नाही खोटे बोलणे किती वाईट असते. अन्या जिवलग मित्र असूनही मन्याला चांगली सवय लागावी या हेतूने मित्राचे साथ देणारा अन्या खूप छान मुलांना भावल्याशिवाय राहत नाही.
      गौरव कथेमधला गौरवचे अक्षर किती सुंदर आहे? म्हणून खेडेगावातून आलेल्या गौरवच सरांनी केलेलं कौतुक गौरवच्या आयुष्याला आकार देणारं आहे .भाषा हे बोलण्याचा माध्यम असले तरी खेडेगावातून आलेल्या गौरवला गृहपाठ न केल्याबद्दल सरांनी उठवलं खरं पण गौरवच्या सुंदर अक्षरा पुढे अवाक झालेले मराठी विषयाचे काळे सर गौरवचे मनापासून अभिनंदन करतात. गुरु शिष्याचं नातं कसं असावं? विद्यार्थी कसा असावा? विद्यार्थ्यांचा अक्षर कसं असावं?  असे अनेक प्रश्न बालमनाला पडल्याशिवाय राहत नाहीत.सुंदर अक्षर हाच सोन्याचा दागिना आहे ही ओळ बालमनावर संस्कार नक्कीच करून जाते.
       गणित येत नाही म्हणून घाबरलेल्या रम्याला केवळ संकटात मदत करणाराच खरा मित्र. या सरांच्या एका ओळीचा पडलेला प्रभाव अमितवर दिसून येतो. त्यामुळे अमित रम्याशी मैत्री करतो. संकट काळात मदतीला धावून येतो तोच खरा मित्र . हा सुविचार या कथेमध्ये दिसून येतो.अमित वर झालेले योग्य संस्कार गणेश सारख्या मुलाने किती दिवस त्रास दिल्या तरी चांगले संस्कार सुटत नाहीत चांगल्या विचारांनी माणूस चांगलाच होतो हे शिकवण  मित्र या कथेतून विद्यार्थ्यांना मिळते.
      एक मार्काचं आपण राधाला विचारून लिहून आपणाला २९  मार्क पडले म्हणून त्याचं बक्षीस घेताना हुंदका देत रडणारी सुरेखा सरांना खरं काय ते सांगते. त्यातून खोटं बोलणं हे पापच पण खोटं बोललेलंही सर्वांसमोर सांगून मोठ्या मनाचे सुरेखा प्रामाणिकपणे सरांना बक्षीस परत करण्याचा प्रयत्न करते त्यावर सुद्धा सरांनी तिच्या प्रामाणिकपणाचे केलेलं कौतुक बालकांना प्रामाणिकपणाचे संस्कार पेरून जाते आणि लहान मुलांना विचार करायला लावणारी ही कथा आहे. वास्तव जाणून न घेता माने सरांनी सुन्याला केलेली शिक्षा सरांच्याही काळजाचा ठोका सत्य ऐकल्यावर चुकल्यासारखा वाटतो. कधी कधी जे दिसतं तसं नसतं मनानं सुन्याला मार बसावा म्हणून जाणीवपूर्वक मन्याने दप्तरात ठेवलेली वही बालवयातला वर्गातला खोडसाळपणा दाखवतो. केवळ बघ्याची भूमिका न करता सत्य सांगणारे रवी आणि दिनू यांनी सरांना सांगितलेले सत्य सुद्धा सांगण्यासाठी धाडसच लागतं हा संस्कार फार महत्त्वाचा आहे. नाजूक परिस्थिती असणारा प्रत्येक जण चोरच असतो असे नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी मानलेले नाते किती श्रेष्ठ असतात.पेपर टाकणारा पेपरवाला खुशीचा जीव वाचवतो तेंव्हा सख्खा भाऊ नसल्याचे दुःख विसरून राखी पेपरवाल्या भैयालाच आपला भाऊ मानते. त्याने राखीचा जीव वाचवला होता. अशा बहिण भावाच्या निष्पाप प्रेमाची कथा बालमनावर नक्कीच संस्कार पेरणारी आहे.
      एका वडील नसलेल्या बबनच्या घरची परिस्थिती खूपच नाजूक होती. बबन अभ्यासात खूप हुशार होता पण त्याच्याकडे गणवेश घ्यायला पैसे नव्हते. पॅडी नावाचा मुलगा आपल्या गरीब मित्राला खाऊच्या जमा केलेल्या पैशातून ड्रेस घेऊन देतो.ही कथा बालकांच्या खोल मनात शिरल्याशिवाय राहत नाही. पॅडीची गोष्ट ही कथा बालमनावर एकमेकांना मदत करायला लावणारी आहे. 
      उमेश मोहिते सरांच्या सर्वच कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या आहेत. कितीही गरीबी असली तरीही रघु यशवंतकडे स्वतः दूध तालुक्याच्या ठिकाणी घालायला सायकलवर घेऊन जातो. रघुची सायकल घेण्यासाठी चाललेली धडपड ही ' खरी कमाई' या कथेतून दिसून येते.खरंच खरी कमाई ही कथा आणि त्यावर रघूचे प्रामाणिक कष्ट वाखाण्याजोगी आहे. प्रामाणिक रघुचा संघर्ष 'खरी कमाई' या कथेतून दिसून येतो. बाळू आणि गजाच भांडण कायमचं मिटवण्यासाठी राखीने केलेली राखीची आयडिया कौतुकास्पदच आहे. मुलांनी आपापसात भांडू नये हे राखी या कथेतून दिसून येते. नेहमी शाळा बुडवणारा पम्या अभ्यासात जरी कच्चा असला तरी एलिमेंट्रीच्या परीक्षेत मात्र तालुक्यातून पहिला नंबर मिळवतो. यावरून अभ्यास न करणाऱ्या मुलांना ही कथा खूप प्रेरणादायी आहे. शाळेविषयी आवड निर्माण करणारी आहे. भेट, शाबास रघु आणि सई या कथासुद्धा खूप चांगल्या संस्कार घडवणाऱ्या व शाळेविषयी अस्मिता बाळगणाऱ्या संस्कारक्षम कथा आहेत.
     लेखक उमेश मोहिते यांच्या पॅडीची गोष्ट या कथासंग्रहातील सर्वच कथा लहान मुलांवर चांगले संस्कार घडवणाऱ्या तर आहेतच पण बालकांना नक्कीच प्रेरणा देऊन जाणा-या आहेत. सानथोरानी सर्वांनीच वाचावा असा उत्कृष्ट बालकथासंग्रह सर्वच शाळेमध्ये निश्चितच असायला हवा. उमेश मोहिते सरांची साधी सरळ सोपी भाषा बालमित्रांच्या अंतकरणाला भिडणारी आहे. प्रत्येक शिक्षक, पालक आणि बालक यांनी आवर्जून वाचावा असाच कथासंग्रह म्हणजे - पॅडीची गोष्ट 
पुढील वाटचालीसाठी उमेश मोहिते सरांना खूप खूप शुभेच्छा...

लेखक -उमेश मोहिते 
प्रकाशन -इसाप प्रकाशन,नांदेड 
प्रथम आवृत्ती -१० ऑगस्ट २०२४ 
मूल्य केवळ- एकशे वीस रुपये फक्त
पुस्तक मागवण्यासाठी फोन -९४०५०७२१५४

समीक्षिका/लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७




No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...