आज आपण समाजात पाहतो प्रत्येक रोगांवर औषध आहे ईलाज आहे पण आज पर्यंत संशयावर कोणताही इलाज नाही. उपचार नाही. औषध नाही. जुनी लोकं म्हणतातच ना की संशयी स्वभावाला औषध नाही. कोणाच्या सांगण्यावरून कुणाचा स्वभाव बदलत नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा. कुणाचा प्रेमळ, कुणाचा तांमसी, कुणाचा हेकड, तर कुणाचा स्वार्थी, कुणाचा कंजूशी, कुणाचा साधाभोळा तर कोणाचा रागीट, कुणाचा संशयी तर कुणाचा मतलबी पण स्वभावाला औषध अजून तर जगात सापडले नाही. हेही तितकच खरं.
आजकाल नवरा बायकोच्या नात्यांमध्ये संशय खूप बळावत चाललेला आहे. या संशयी स्वभावामुळेच अनेकांचे संसार उध्वस्त होत असताना आपण पाहतो कित्येकांचे गैरसमज होऊन घटस्फोट होत असतात. लग्न होऊन दोन-तीन वर्ष झाले नाही की संशय बळावत जाऊन नवरा बायकोमध्ये भांडण होतात.भांडण इतके विकोपाला जातात की नवरा बायको एकमेकांचे तोंड पण पाहू शकत नाहीत. कारण नसताना जर नवरा बायकोने एकमेकावर संशय घेतला तर मग त्यांना घटस्फोटापासून कोणीच वाचू शकत नाही. एखाद्या बाईने दुसऱ्या पुरुषाला हसून बोललं किंवा एखाद्या पुरुषाने दुसऱ्या स्त्रीला असून बोललो किंवा तिचं कौतुक केलं किंवा एखादी मदत केली की झालं लगेचच गैरसमज करून संशय बळावत जातो. संशय बळावत जाण्यामागे मूळ गैरसमजच आहे. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला समजून घेतलं तर गैरसमजाला जागा राहत नाही. गैरसमज करून घेणं आजकालच्या पिढीतला दुर्धर आजारच झाला आहे. संशय घेणे मानसिक रोगच. नवरा बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकांवर अफाट विश्वास असायला हवा. नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर फुलत असतं, डुलत असतं.विश्वास नसला की विश्वासाची जागा गैरसमज घेऊन टाकतो आणि गैरसमजातून संशयी वृत्ती बळावत जाते.त्यातूनच घटस्फोट सारखा प्रकार पुढे येताना दिसतो. जर घटस्फोट झाला तर ज्यांचा काहीच दोष नाही अशा बिचा-या लेकरांना मायबापाच्या प्रेमापासून वंचित राहावं लागतं. बिचा-या लेकरांना त्यांचा दोष नसताना शिक्षा भोगावी लागते. शेवटपर्यंत कुणाच्या तर आई किंवा वडिलांच्या प्रेमाला मुकावे लागते. याचा विचार कधी करणार आहेत हे लोकं? छोट्या-छोट्या मुलांना आई सोडून जाते किंवा सोबत घेऊन जाते त्या पुरुषाचे दुसरे लग्न होते. त्याची दुसरी बायको त्या मुलांना नीट पहात नाही. जी चूक त्या मुलांनी केलेलीच नसते त्याची शिक्षा त्या मुलांना आयुष्यभर भोगावी लागते. म्हणून नात्यांमध्ये गोडवा हवा. विश्वास हवा एकमेकावरचं अतूट प्रेम हवं.
मागे वृत्तपत्रात एक बातमी वाचली की एका महिलेने नवऱ्याचा दुसऱ्या बाईसोबत प्रेम प्रकरण आहे अशा संशयातून पतीचाच खून केला तर दुसऱ्या पेपरमध्ये संशयावरून पत्नीने केली बायकोची हत्या. कुठे चाललाय आपला देश? कुठे चाललीय आपली संस्कृती ? पूर्वीच्या बायका नवऱ्याला पती परमेश्वर मानत असत. इतका आदर होता आजच्या काळातल्या बायका तर नवऱ्यावर त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मोठी गदा आणत आहेत. माझा नवरा कुण्या बाईला बोलला नाही पाहिजे,आईला बोलला नाही पाहिजे, बहिणीला बोलला नाही पाहिजे, फक्त मलाच राणी बनवून डोक्यावर चढवून बसला पाहिजे. असे अनेक कौटुंबिक वाद आपण आजूबाजूला पाहत असतो. मला तर नवलच वाटतं.पत्नीपीडित पुरुषांची संस्था बघून असं पूर्वी कधी ऐकायला बघायला मिळालं नव्हतं. हे पुरुषाकडून स्त्रियांना त्रास झालेल्या बातम्या कित्येकदा आपण वाचतो पण पत्नीपीडित पुरुषांची संस्था येथे ज्यांना ज्यांना बायका कडून त्रास होत होता.त्यांची मदत केली जाते.कोर्टामार्फत किंवा समुपदेशनाचे त्यांचे उद्बोधन केलं जातं. आजकाल कितीतरी घटस्फोटांचे अनेक प्रकरण पोलीस स्टेशनला महिला समुपदेशन केंद्रामार्फत नवरा बायकोला दोघांनाही समोर बसून त्यांचा समुपदेशन मार्गदर्शन केले जातं.घटस्फोट घेण्यापासून त्यांना वाचवलं जातं. किती प्रकरण मिटतात. काही मिटतच नसतात. तिथे घटस्फोट हा शेवटचा पर्याय असतो. या सगळ्या गोष्टींना एकमेव कारणीभूत आहे तो म्हणजे माणसाचा स्वभाव. कुठल्याही नात्यांमध्ये थोडंसं अॅडजेस्ट केलं की नातं छान टिकतं कुणीतरी माघार घ्यावी लागते. कुणीतरी समजून घ्यावं लागतं. संशय वृत्ती वाढीस लागू न देण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण आहे आपले संस्कार जे माणसाला विचलित होऊ देत नाहीत. चांगल्या संस्कारात वाढलेले लेकरं पुढे जाऊन चांगलीच वागत असतात. म्हणून लहान मुलांवर योग्य त्या वयातच चांगले संस्कार घडत असतात.लहान वयाच्या मुलांनी आई-वडिलांची भांडण ऐकलेली असतात त्याचा परिणाम ती मूलं चिडचिडी बनतात. पुढे चालून ती ही भांडखोर वृत्तीची बनतात. याला काही अपवाद असू शकतात पण 'पेराल तसे उगवते' या म्हणीप्रमाणे लहान संस्कारक्षम वयात चांगले संस्कार, नम्रता, सहकार्याची वृत्ती, श्रद्धा, विश्वास, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मैत्रीपूर्ण संबंध, निष्ठा, तत्त्वज्ञान, चिकित्सकवृती,व्यवहार ज्ञान, वेळेचा सदुपयोग, थोरामोठ्यांचा आदर, असे कितीतरी संस्कार पेरावे लागतात. असं नाही की ती थैली घेऊन बाजारात जाऊन ती विकत घेऊन यावे लागतात. संस्कार विकत घेऊन येण्याची गोष्ट नाही. सुसंस्कृत सुसंस्कारित मुले तेंव्हाच घडतात ज्यांच्या आई-वडिलांचे संस्कार चांगले असतात. आई-वडिलांचे संस्कार चांगले नसतील तर मग किती संस्काराचे डोस पाजले तरी काही उपयोग नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे आपण चांगले तर आपले अपत्य पण चांगलेच निघणार यात तिळमात्र शंका नाही.
अरे संशय संशय
कसा बळावत जातो
करून घराचा धिंगाणा
हळूच घरात येतो....
अरे संशय संशय
कशी नाती दुरावती
फूट पाढून दोघांत
ज्ञघटस्फोटाने जागा घेती....
संशयीवृत्ती हा मानसिक आजार आहे. असा अनेक तज्ञांच्या मते सिद्ध झाला आहे. जिथे संशयाला पालवी फुटते तिथे घराची बरबादी सुरू होते. वेळीच स्वतःला आवरा आणि संशयाचा चष्मा वेळीच दूर फेका तरच ख-या अर्थानं जीवन सुंदर होईल... आयुष्य खूप सुंदर आहे.फक्त ते छान जगता आलं पाहिजे.
लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कोकलगाव...
No comments:
Post a Comment