मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, April 13, 2026

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन 

उपक्रमशील व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या ५ व्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्याला शिवाजी हायस्कूल वाशिम येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.वत्सगुल्मी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे सरांची लाभली आहे तर पाठराखण प्रसिद्ध लेखक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मा.एकनाथ आव्हाड सर यांनी केली आहे.
      मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे यांचे यापुर्वीचे साहित्य म्हणजे त्यांचा पहिला काव्यसंग्रह चिमणी पाखरं,तसेच सुकळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कवितांचा बालकवितासंग्रह -उमलती फुले,(महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला काव्यसंग्रह व पहिले बालकविसंमेलन मिनाक्षी नागराळे यांनी सर्किट हाऊस वाशिम येथे घेतले होते.तिसरे पुस्तक म्हणजे 'स्वराज्याचे मावळे' हा पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांवर झाला.त्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास कवितेच्या रूपात मांडण्यात आला.याच स्वराज्याचे मावळे या काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुंबई येथील ग्रंथालयात निवड झाली तसेच महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली.या आगळ्यावेगळ्या काव्यसंग्रहाचे साहित्यप्रेमीनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर लॉकडाऊन काळात महाराष्ट्रभरातून पुस्तके समिक्षणासाठी भेट येत असतं त्या पुस्तकावरचे समिक्षण करून त्याचा समकालीन समिक्षा ग्रंथ निर्माण झाला.या ग्रंथाचा उपयोग पिएचडी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे.
              शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक तालुक्यातून कवितेसाठी तीन नंबर काढण्यात आले होते.ते शिक्षक तालुक्यातून  विभाग स्तरासाठी पात्र ठरले होते.त्या निवडक कवितांचा पाच जिल्ह्यांतील शिक्षकांच्या स्पर्धा या वाशिम जिल्ह्यात घेण्यात आल्या त्यामुळे या काव्यसंग्रहाला वत्सगुल्मी हे नांव देण्यात आले.
वाशिम जिल्ह्याला साहित्यिक वारसा राजा वाकाटक ते वत्सगुल्मीच्या काळापासूनचा असल्याने आणि वत्सगुल्मी ही एक साहित्यशैली असल्याने वाशिमचे जुने नांव वत्सगुल्म असल्याने या काव्यसंग्रहाला कवयित्री /लेखिका,समिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी खूप विचारपूर्वक दिले आहे.
     मिनाक्षी नागराळे यांना सावित्रीमाई फुले कवयित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने २०२३/२४ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मध्ये जिल्हास्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आजपर्यंत मिनाक्षी नागराळे यांना ९१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९२,व ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेची निवड झाली होती.मिनाक्षी नागराळे यांना साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक,कार्यासाठी आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षकी पेक्षात तर अग्रेसर असणाऱ्या तळागाळातील गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाचा लळा लावणा-या या ध्येयवेड्या शिक्षिकेला उद्याच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या हार्दिक शुभेच्छा.... खूप खूप अभिनंदन

Wednesday, April 1, 2026

१३) केल रशियन भाजी (आयुर्वेदिक कविता)

 १३) केल रशियन भाजी(आयुर्वेदिक कविता)

ही एक रशियन भाजी 
केल तिचे नाव आहे 
त्यात कोणकोणते पौष्टिक घटक 
मिनू त्याचा संदर्भ पाहे....!!

विटामिन ए विटामिन सी 
 विटामिन के व कॅल्शियम असे भरपूर 
पोटॅशियम व मॅग्नेशियम 
 आणि काय ब्रोहाइड्रेट्सचे प्रमाण पुरेपूर ...!!

हृदयासाठी खूप फायदेशीर 
भरपूर असतो फायबर 
कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि 
आटोक्यात ठेवतो ब्लडप्रेशर ....!!

अँटिऑक्सिडेंट्स मुळे 
फॅट होते कमीत कमी 
जुने आजार पळून जातील 
मिळेल  निरोगी शरीराची हमी....!!

 भरपूर कॅल्शियममुळे 
हाडे होतात खूप मजबूत 
कॅन्सर पासून बचाव होतो 
केल जणू आरोग्याचा दूत....!!

 रोगप्रतिकारशक्ती वाढवते 
विटामिन ए मुळे सुधारते डोळ्यांची दृष्टी 
आयुर्वेदाचा खजिना अमाप आणि 
औषधी गुणांनी युक्त भरली सृष्टी.....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक 
शाळा जांभरून नावजी

चिमणी दिनानिमित्त कविता (२२ मार्च २०२६)

 चिमणी दिनानिमित्त कविता ( २२ मार्च २०२६)

येता चिवचिव करी
डोळे इवले इवले 
देह सानुला सानुला 
चिमुकली ती पाऊले....

लुकलुक मान हले 
चिमणी दारात येते
टिपुणीया सारे दाणे 
उडूनिया मग जाते.....

इवलासा जीव तिचा
होई कासावीस सदा
पाहुणी जणू तीच
तीची वेगळी ती अदा....

ठेवा येळणीत पाणी 
बांधा झाडाला येळण 
थंडगार सावलीत 
दाणे टिपत खेळणं....!!

इवलाश्या गे चोचीत 
घेई इवलासा घास 
टकमक पहातसे 
कुणी आहे आसपास?

दाणे टिपाया येईल 
आला कडक उन्हाळा
तिचा व्याकुळला जीव
कधी येई पावसाळा....

खरकटे नाही दारी
घेती बंगल्याने जागा
चिमणी दिनानिमित्त 
जबाबदारीने वागा......

चिमणी दिनानिमित्त 
सा-यांना शुभेच्छा 
इवलासा जिवाची रे 
पूर्व कर सा-या इच्छा

कवयित्री 
मिनाक्षी नागराळे मॅडम वाशिम

१२) बहुगुणी बेलपत्र (आयुर्वेदिक कविता)

 १२)  बहुगुणी बेलपत्र   (आयुर्वेदिक कविता)

बहुगुणी बेलपत्र 
आयुर्वेदामध्ये महत्त्व फार
बेलाचे पानांच्या खाण्याने 
बरेच कमी होतात विकार....!!

पचनसंस्था सुधारते 
कमी होतो अतिसार 
बद्धकोष्ठता दूर करी 
कमी होईल मधुमेहाचे आजार ....!!

मधुमेहावरचा रामबाण उपाय 
वाढते रोगप्रतिकारक शक्ती 
बेलपत्राच्या पूजनाने मग 
वाढेल महादेवाची भक्ती ......!!

शिवाला अत्यंत प्रिय असे 
धार्मिक पूजेमध्येही तितकेच महत्त्व 
बेलपत्रामुळे शरीराला ऊर्जा मिळे
कफ, वात दूर करे बेलाचे सत्व....!! 

तीन पानांचे बेल हे 
औषधी गुणांची खाण
उन्हाळ्यात तहान शमवी
महादेवाच्या पूजेला सर्वात आधी मान...!!

बेलपत्राच्या सरबताने  बघा
उन्हाळ्यात पोटास मिळे थंडावा 
मुळव्याधीमध्ये आराम मिळतो 
असे गुणकारी बेलाचे झाड लावा....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
🏫 जांभरून नावजी

Monday, March 16, 2026

११) पळस (आयुर्वेदिक कविता)

 ११) पळस (आयुर्वेदिक कविता)

पळसाला पाने तीनच 
म्हण जरी आहे खरी 
पण पळसाच्या पाने, फुले, सालीने 
होतात कित्येक रोग बरी ....!!

पळसांच्या बियांच्या वापराने 
मरून जातात पोटातील जंत 
मधुमेहावर नियंत्रण करते अन् 
त्वचारोग बरा करून कमी करी संधिवात...!!

 खरुज, गजकर्ण, खाज 
करी त्वचा विकार दूर 
पचनसंस्था सुधारते अन्
पोटातील जळजळ होते भूर्रर....!!

पळसांच्या पानांच्या लेपाने 
सांधेवात आणि सूज होते कमी 
पळसावरील डिंक सेवनाने 
महिलांना मासिक पाळीची हमी ....!!

कडक उन्हाळ्यात ही बघा 
 डौलाने फुलतो पळस 
नैसर्गिक रंग बनते फुलापासून 
फक्त बनवायला नका करू आळस...!!

ओसाड माळरानी पळस फुलतो
भुरळ घालतो मानवी मनाला
धैर्याने सामोरे जावे माणसाने 
जणू ओरडून सांगतो जनाला....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
जांभरून नावजी, वाशिम 

Saturday, March 7, 2026

मानवी मनाला अस्वस्थ करून वाचनाचा वेग वाढवणारी कादंबरी म्हणजे - काडीमोडातील काटे होय.

 मानवी मनाला अस्वस्थ करून वाचनाचा वेग वाढवणारी कादंबरी म्हणजे -काडीमोडातील काटे 

       विदर्भातले वाशिम जिल्ह्यातील बोरखडी गावचे हल्ली छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक भ. पु. कालवे सर यांची पहिली कादंबरी 'घट रिकामा'  वाचल्यानंतर पुढील कादंबरी वाचनाची उत्सुकता वाचनाचा वेग वाढवणारी प्रतीक्षेत असलेली 'काडीमोडातील काटे' ही दुसरी कादंबरी नुकतीच वाचनात आली. घट रिकामा या कादंबरीचा दुसरा भाग म्हणजे 'काडीमोडातील काटे' ही कादंबरी होय. एका सरळ मार्गे प्राध्यापक असलेल्या शिक्षकाला जीवन जगताना त्यांचा संघर्ष, होणारी ससेहोलपट, चारचौघात जीवन जगताना येणारी आव्हाने, प्रत्येक आव्हानांना तोंड देताना मेताकुटीला येणारा जीव, नोकरी करणाऱ्यांचे कसे हाल होतात? समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, मित्रांनी दिलेली साथ आणि आपल्याच  नातेवाईकांनी केलेला घात या सगळ्यांची उकल करणारी, वाचनाचा वेग वाढवणारी व मानवी जीवनाला अस्वस्थ करून विचार करायला लावणारी कादंबरी म्हणजे  'काडीमोडातील काटे'  होय.
           प्राध्यापक अशोक व त्याची बायको उर्मिला यांच्या संसाराचा न बसलेला ताळमेळ, परिस्थितीशी दोन हात न करण्याचा अट्टाहास, आपापल्या पात्रामध्ये ठामेठोकपणे राहणारी पात्र, समयाशी जुळवा जुळव न करता येणारं जोडपं, त्यामध्ये त्या चिमुकल्या बाळाची होणारी परवड वाचताना माणूस म्हणून विलक्षण अस्वस्थ होतो. 
          काडीमोडातील काटे वाचताना अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत. वाचकाची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत टिकून राहते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्राध्यापक अशोक यांना सात वर्षात ९ वेळा घरं बदलावी लागतात. त्यामुळे वैतागून गेलेला अशोक शेवटी स्वतःच्या घरासाठी पैशाची जुळवाजुळ करून शेवटी स्वतःच्या घरात राहायला जातो. त्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते पण नवीन घरांमध्ये सुद्धा अशोक व उर्मिलाचे वाद  कांहीं थांबत नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांचे रोज वाद होत. कित्येक वेळा ते वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे प्राध्यापक आशोकने उर्मिला पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जुडीसीएल सेपरेशन साठी अॅड . विजय मोठे यांच्याकडे जाऊन घटस्फोटाची केस दाखल करतात त्यामुळे आयुष्याचा एवढा मोठा निर्णय प्राध्यापक आशोक घेताना एखाद्या अग्नि कुंडात होरपळल्यासारखा अनुभव घेतात. छोट्या बाल सुकन्येला सोडून जाताना एका बापाची होणारी तळमळ या कादंबरीतून दिसून येते. नवरा बायकोच्या संसारी घरगुती भांडणाची ही झालेली सुरुवात शेवटी कोर्टकचेरीत पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामध्ये उर्मिलाचे बाळाला बाथरूम मध्ये कोंडणे, घटस्फोट नको म्हणून अंगावर रॉकेल ओतून घेणं, सतत घरात भांडण करणं आणि दोघांनीही पोटच्या गोळ्याचा म्हणजे त्या चिमुकलीचा विचार न करणं हे सगळं आधाशा सारखं वाटतं. एक माणूस म्हणून विचार न करणारे हे जोडपं वाचकाला मात्र नक्कीच विचार करायला लावतो. 
     चार भिंतीच्या आतलं भांडण हे कोर्टात गेलं होतं. उर्मिला आणि अशोकच भांडण खूप पुढे गेलं होतं. त्यांना कशाचीही तमा राहिली नव्हती. राजाराणीसारखं  सुखाचा संसार करणारे पती-पत्नीचे प्रेम नावालाही शिल्लक राहिले नव्हतं. अशा परिस्थितीमध्येही अशोकला आशा होती की आपण एकदा उर्मिलाचा पिच्छाच सोडून टाकावा आता एकत्र राहण्यात मज्जा नाही. मनाने दुभंगलेली ही दोन जीवं तिसऱ्या जीवाचा पण विचार करायला तयार होत नव्हती. शिक्षकी पेशातल्या प्राध्यापकाला इतक्या कोर्टकचेऱ्या, कोणत्या नातेवाईकाची करावी लागली विनंती, झालेला त्रास, लागलेला पैसा आणि वाया गेलेला वेळ व वाढलेला डोक्याचा ताण अगदी मन विषन्न करतं या संपूर्ण प्रक्रियेत काडीमोड करण्यासाठी मनाभावापासून सामील असणारे दुलंगे सर, चिंचाणे सर , डॉक्टर श्रीधर हिंगे, तहसीलदार पाटील साहेब, सरपंच शामरा गावंडे, ए.पी.आय वाळवे, कॉन्स्टेबल साखळे, अॅडवोकेट गवशे, अॅडवोकेट रावराणे, अॅडवोकेट लाखोबा लोखंडे, साखळी अॅडव्होकेट गवशे ,  अॅंडवोकेट रावराणे, अॅडवोकेट पाल्हेटकर , अॅडवोकेट हातने , एएसआय खानापुरे, इंजिनियर कोराने साहेब , अॅडव्होकेट ट आर्वीकर, अॅवोकेट देव उमरखेडकर , अॅडव्होकेट.केट बारणे, एडवोकेट गजाणे तसेच उर्मिलाची वडील आणि उर्मिलाची मैत्रीण राज्यांमध्ये हावरे हे सर्व यामध्ये प्रमुख भूमिका निभावतात या सगळ्या प्रकारात अशोकला फाडून खाणारे पोलीस , प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जण पैसेच मागत होता. कुत्र्यांना एक एक तुकडा टाकावा तसं प्रत्येक पोलिसांना वेगळे पैसे आणि वकिलांची वेगळी फेज त्यामध्ये होणारा मनस्ताप यानेच अशोक चक्राहून गेला होता . कधी एकदा काडीमोड होईल यास प्रतिक्षित राहणारा अशोक फार उदासीन होता या सगळ्या तानात पोलिसांनी मागितलेली पार्टी टेबलाखालून मागितलेली रक्कम आणि पावलो पावलाला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी लुबडणारे पोलीस आणि वकील यांच्यामध्ये हतबल झालेला अशोक मात्र हरवून गेला होता. 
          एकंदरीत शिक्षकेपेक्षा असणाऱ्या अशोकला जेवढी सुज्ञ, सुशिक्षित , सुसंस्कारित पत्नी मिळायला हवी होती ती मिळालीच नाही.गुण सुरुवातीला उर्मिलाने दिलेल्या चार कवितेमुळे अशोकला समजल्यास नाहीत म्हणून कुणाच्या कवितेवरून त्याची मूळता विचार सुसंस्करित असतीलच असे नाही काडीमोडातील काटे या कादंबरीला असेच इतका गहन प्राध्यापक व पुकालवे यांनी मांडला आहे की शेवटी काय झालं असेल अशी उत्सुकता वाचकाला लागून राहते त्यामुळे कादंबरीवर वाचनाचा वेग आपोआप वाढल्याशिवाय राहत नाही . शेवटी गाडी मोडं  होऊन नकारात्मक तिकडेच कडून सकारात्मक तिकडे भरपूर कालवे यांनी हा प्रवास अगदी सोयीस्कर रित्या आपल्या लेखन शैलीने या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे प्रत्येक वाचकाला अतुन अस्वस्थ करणारे, कादंबरी वाचकाला वेड लावते सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच ही कादंबरी प्राध्यापक भ.पु. कालवे यांना 
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 

कादंबरी - काडीमोडातील काटे 
लेखक -भ. पु. कालवे 
प्रकाशक- उत्कर्ष प्रकाशन 
पहिली आवृत्ती ३ नोव्हेंबर 2024 
पुस्तक मागविण्यासाठी फोन नंबर- 7263975516 


समीक्षिका लेखिका शिक्षिका कवयित्री 
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
(महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने पुरस्कृत)
 तालुका जिल्हा वाशिम
Mob.- 9767663257

Thursday, March 5, 2026

पाखरांची भरे शाळा (अष्टाक्षरी)

 पाखरांची भरे शाळा ५/३/२०२६

नभी सूर्य येता वर
पाखरांची भरे शाळा 
चिव करत चिमणी
लाविते बाळास लळा....!!

दारी अंगणात बाई
खरकटे गे सांडले
एक एक कण घेई
जीव झाडाले टांगले....!!

दाणा चोचीत टिपते 
भरवी पिल्लांना घास 
माय आणील चोचीत
छोट्या पिल्लांना ती आस...!!

पंख येता गे पिल्लांना
होई जीव वरखाली 
बळ पंखात भरते 
आई खरी रखवाली....!!

पिल्लांसाठी जीव तिचा
त्याच घरट्यात राही
दाणे आणील चोचीत 
छोटी पिल्लं  वाट पाही....!!

ठेवा अंगणात पाणी 
टाका अंगणात दाणे 
चिमुकल्या पावलांनी 
सुरू पक्षाचे टिपणे....!!

एक घास रे काऊचा
एक घास रे चिऊचा 
हरवून गेले कसे 
बंगल्यात आज गाणे....!!

नाही अंगण राहिले 
नाही पक्ष्यांची ती गाणी
कुठे हरवली आज 
सांगा किलबिल वाणी?

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
 जांभरून नावजी, वाशिम 

Monday, March 2, 2026

असा एक रंग (कविता)

 असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता)

असा एक रंग संस्कारांचा 
आचरणातून दिसावा
रूसवा फुगवा इथे मात्र 
कुणाला कुणाचा नसावा....!! १!!

असा एक रंग 
निर्मळ मनाचा असावा
ह्रदयात शिरूर हळूच
ठाव काळजाचा घ्यावा.....!!२ !!

असा एक रंग 
सा-या जगाला दिसावा
भेदाभेद करूनी उगीच
मोठेपणा,खोटपणा नसावा...!! ३ !!

असा एक रंग 
मायेचा तोलावा जपावा
माणसातला माणूस शोधताना
तिथे ओलावा असावा.....!! ४!!

असा एक रंग
उदार त्यागाचा असावा
डोळ्यांवरचा विश्वास 
कानावरती नसावा......!! ५ !!

असा एक रंग 
ख-याखु-या श्रमाचा असावा
मेहनतीचे खास खाताना 
समाधानाचा असावा....!! ६!!

असा एक रंग
माणसाचा रंग ओळखणारा असावा 
बेगडी या दुनियेत 
स्वार्थाने बरबटलेला नसावा....!! ७ !!

असा एक रंग 
सदा माणुसकीचा असावा
कुणाला कुणी दुखवण्याच्या 
कसला हेतू नसावा.....!! ८ !!

अशा या होळीच्या सर्वांना 
हार्दिक शुभेच्छा....🌹🌹🌹 
कवयित्री 

Sunday, March 1, 2026

https://youtu.be/RpWKh0gRZ6c?si=wAGRN-b3Up4oNDkI

माझ्या मराठीची शान ...

 स्पर्धेसाठी 
साहित्य सेवा प्रकाशन आयोजित काव्य स्पर्धा
दिनांक -२७/२/२०२६
विषय - मराठी भाषा गौरव दिन

शीर्षक - माझ्या मराठीची शान

माझ्या मराठीची शान ,दऱ्याखोऱ्यात नांदते 
बोल मराठीचे श्लोक, तुका, ज्ञानोबा बोलते ...||

माझ्या कवितेला साज, शब्द मराठी लावते 
 बोल मराठीचे थेट, काळजाला हो भिडते....|| 

 माझी बहीणाई, जनी, ओवी जात्यावर गाते 
धमन्याधमन्यातही, माय मराठी वाहते....|| 

 ओवी,भारुड, पोवाडा, साज शृंगारही घेते 
बोल बोबडेही बाळ,  शब्द मराठीत येते...||

बोल कीर्तनाचे रंगी,  साज मराठी लावते 
बोल मराठीचे मृदू , नित्य मनाला भावते ....||

गीत, गझल सुंदर, शब्द झंकार मांडते 
शिवशंभु संस्कारीत, शब्द मोती हे सांडते ...||

माझ्या मराठीची शान, दाही दिशा नित्य गाजे 
माझ्या मराठीचा डंका, साऱ्या जगात हो वाजे....||

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
वाशिम

आदरणीय अनिल पाटील सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

 आदरणीय अनिल पाटील 
 सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..


सदा हसरे व्यक्तिमत्व 
सदा आनंद चेह-यावर
दिलखुलास मनाचा राजा
स्पष्टपणे बोलण्यावर भर....!!

अजातशत्रू स्पष्टवक्तेपणा
देवालाही तोच आवडला 
शाळेवरून येता येता 
कसा काय तो काळ भिडला....?!!

स्वतःहून बोलत इतरांना 
नव्हता कधी कसला गर्व 
शेवटच्या प्रवासाला घाई का 
अन्  दुःखात बुडले सर्व....!!

ताईसाहेब म्हणून हाक तुमची
ऐकू येईल सदा कानी
हरवून गेली अचानक 
अनिल पाटलांची मंजुळ वाणी....!!

निशब्द झालोत आम्ही 
काय बोलावे ते सुचेना
बातमी ऐकून बैचेन झाले अन् 
वास्तव काही रूचेना....!!

असा कसा देवा तू निष्ठूर झालास
निमित्त मात्र बैलाचे केलास
सोन्यासारखा माणूस का मग
आमच्यातून हिरावून नेलास....!!

ताईसाहेबांकडून भावपूर्ण श्रद्धांजली...
मिनाक्षी नागराळे वाशिम 

Friday, February 27, 2026

राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे श्री महेश देवळे सर

 *राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे महेश देवळे सर*

       महेश देवळे सर एक उत्तम सूत्रसंचालन करणारे, सदैव चेहऱ्यावर स्मितहास्य करत आपल्या मधुर वाणीतून प्रेक्षकांचे मन जिंकणारे दिलखुलास व्यक्तिमत्व होय. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या कन्येचा नामकरण सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन आणि वाशिम नगरीतल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा सरांनी आयोजित केला होता. 
        आजच्या आधुनिक युगात, मॉडर्न युगात वाढदिवस म्हणले की केक, हार,फुगे,हॉटेल्स बुक करणे, फटाक्यांची अतिशबाजी वगैरे वगैरे मोठ्या धुमधडाक्यांनी  साजरे केले जातात. पण या सगळ्या विचारांना फाटा देत राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे विचार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नसानसात भिनलेले श्री.महेश देवळे सरांनी मुलींचे फक्त नांवच जिजाऊ न ठेवता जिजाऊंचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविले ते म्हणजे त्यांची कन्या तिचे नाव सरांनी जिजाऊ ठेवले. फक्त नावच नाही तर पुरोगामी विचारांना फाटा देत नामकरण सोहळा आयोजित केला या सोहळ्याची सुरुवात सुरसंगीत जिजाऊ वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती सुरेखाताई आरू (विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड) प्रमुख उपस्थिती सौ. अन्नपूर्णाताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा)  होत्या.जिजाऊ वंदना झाल्यानंतर महेश देवळे सरांच्या मुलींचा म्हणजे कु.जिजाऊ महेश देवळे हिचा नामकरण करण्यात आले...त्यानंतर पाळणा गायनासाठी  जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका कार्यकारिणीच्या भगिणी यांनी जिजाऊ पाळणा गायला ...सुगमसंगीताने प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच जिजाऊ वंदना सौ सुनिता कढणे,वैशाली बुंधे यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. जिजाऊं वंदना झाल्यानंतर जिजाऊंची रांगोळी अतिशय सुंदर कु.सदिच्छा दत्ता वरखडे यांनी अप्रतिम सुंदर रांगोळी मॉंसाहेब जिजाऊ यांची काढली तर संचालन कु. माधुरी बहादुरे यांनी केले. 
     छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे विचार फक्त सांगून किंवा ऐकून गप्प न बसता प्रत्यक्ष  कृतीतून उतरावत श्री महेश देवळे सर यांनी ' न भूतो न भविष्यती ' असा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन तो समाजसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.तो म्हणजे वाशिम नगरीतल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला. यामध्ये शिक्षण, राजकारण, समाजकारण, आरोग्य व साहित्य अशा विविध क्षेत्रातील एकूण दहा महिलांचा गुणगौरव स्मृतिचिन्ह शाल देऊन जुनी आयुडीपी मध्ये करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षण व साहित्य यामध्ये मीनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका तसेच उपक्रमशील शिक्षिका व साहित्यिक कवयित्री शिक्षिका ), राजकारण सौ. अन्नपूर्णा ताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष) व सौ पूजा विनोद खंडेलवाल (लोकप्रतिनिधी) आरोग्य- डॉक्टर वैशाली चौधरी व डॉक्टर अर्चनाताई रेघाटे (रुग्णसेवा ), समाजकारण- सो सुरेखाताई आरू सौ. सविताताई बोरकर (जिजाऊ ब्रिगेड वाशिमच्या जिल्हाध्यक्ष) साहित्य - सौ मधुरानी बनसोड (साहित्य )तसेच नवोदित लेखिका-ज्योतीताई देशमुख अशा सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांना सन्मानचिन्ह, शाल देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सोहळा व वाढदिवसानिमित्त महिलांचा गुणगौरव करण्यासाठी फक्त राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचे विचारच नाहीत तर माणसाचं मन,मनगट,मेंदू सशक्त असावं लागतं इतकंच नाही तर मनही मोठं असावं लागतं. अशा या महेश देवळे सरांच्या कार्याला मानाचा मुजरा... समाजातील लोकांनी सरांचा आदर्श घ्यावा असाच कार्यक्रम महेश देवळे सरांनी केला त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 


लेखिका, कवयित्री समिक्षिका,शिक्षिका,संपादिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम 
(महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित)

Saturday, February 21, 2026

वास्तवाचे भान असावे (गझलसदृश कविता)

 वास्तवाचे भान असावे ( गझलसदृश कविता)

माणसा कधी कुणी कुणावर ना रूसावे
माणसाला सदा वास्तवाचे भान असावे....!!

क्षणिक सुखासाठी जगतो आपण सारे 
फुलपाखरासारखे जीवनगान असावे....!!

आपला आपण कशास करावा गाजावाजा
तू कोण आहेस? सा-यांनाच जाण असावे....!!

मरमर का करतो कुणास ठाऊक गड्या
खुशील जिंदगी ही अन जीवन छान असावे...!!

दुस-यांनी फिदा व्हावे रोज तुझ्यावर 
असे तुझे ते कार्य तितकेच महान असावे....!!

दोन दिवसांची जिंदगी तुझी रे 
पर चारचौघात तुजला मान असावे....!!

मीपणा कधी सोडून तर बघ एकदा 
तेच माणसा सर्वात मोठे ते दान असावे...!!

निघून गेल्यावर आपण, अश्रू व्हावे अनावर 
असे सुवर्ण अक्षरी ते पान असावे....!!

काय घेऊन बसलात वेड्या तू तर थेंब सागराचा
उडू नको हवेत राजा वास्तवाचे भान असावे...!!

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 

Friday, January 23, 2026

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा:  शहाणपण थोडे जप पुन्हा  शब्द आहेत अमुल्य वेडे जपून वापर त्याचा कर पुन्हा  शब्द असे दुधारी तलवार सये निर्मळ मनाचा काय गुन्हा....!...

सोड सोड हेवेदावे (अष्टाक्षरी काव्य)

सोड हेवेदावे (अष्टाक्षरी) सोड सोड हेवेदावे सारे जगतासी ठावे नको काढू उणेदुणे सदा आनंदी रहावे....!! काय आपण करावे आपुल्या मना पुसावे सत्याच्या शोधात सखे सदा आनंदी असावे....!! ज्याचे त्याचे असे माप आपण का ते तोलावे कुणा दुखवेल असे नाही शब्द ते बोलावे....!! सोड सोड हेवेदावे जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे सदा खरे ते बोलावे....!! सोड सोड हेवेदावे आपुले कर्म ते करावे ज्याचे त्याचे तैसे कर्म ज्याचे त्यानेच भरावे.....!! आकाशाला गवसणी भाग्य थोर तुझे ठरावे सदा सा-यांचे बनून सुख जीवनी पुरावे....!! एकमेकांच्या आयुष्यात सुगंधीरूपी फुलावे प्रेमसागरात डुबू निया हळुवार तू डुलावे.....!! कार्याची ती गोड थाप कधी नाही विसरावे मरावे परी सखये किर्तीरूपी तू उरावे....!! किर्तीरूपी तू उरावे.....!! कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

Wednesday, January 21, 2026

शहाणपण थोडे जप पुन्हा

 शहाणपण थोडे जप पुन्हा 

शब्द आहेत अमुल्य वेडे
जपून वापर त्याचा कर पुन्हा 
शब्द असे दुधारी तलवार सये
निर्मळ मनाचा काय गुन्हा....!!

अति महत्त्वकांक्षी होणं 
खरंच चांगले नाही 
तुला मात्र अस्तित्व दाखवण्याची 
फार फार घाई.....!!

लाख मोलाची मायेची माणसं 
परिघात जपून ठेवं पुन्हा 
कोणास ठाऊक कोण कसा विचार करतो
तिथे शब्दांचा काय गुन्हा?

वेळ निघून गेल्यावर कळेल
मग अपराधी वाटेल पुन्हा 
तुझे मन तुलाच विचारेल प्रश्न 
तिथे मग शब्दांचा काय गुन्हा?

अति उतावळेपणा नाही कामाचा
विचार जाब स्वतःला पुन्हा 
जाणवतील तुजला सखे सतत 
आपलेपणाच्या जपलेल्या खुणा....!!

नाही कुणी वेडे इथे 
वेळ प्रत्येकाची येते पुन्हा 
तुझे तु तूलाच विचार ना 
अति महत्त्वकांक्षी हाच गुन्हा 
अति महत्त्वकांक्षी होणं हाच गुन्हा....!!

कवयित्री 
मिनाक्षी नागराळे 
वाशिम 

Tuesday, January 13, 2026

कवी काय असतो?

 कवी काय असतो?


कवी असतो मुक्त मनाचा
कवी असतो धनी शब्दांचा 
कवी असतो निरंतर लिहीणारा 
कवी असतो मनातला बोलणारा....

कवी असतो वाचा फोडणारा
कवी असतो कवितेत जगणारा 
कवी असतो नियमात वागणारा 
कवी असतो कवितेला जागणारा....

कवी असतो मुक्त शब्दांना गुंफणारा 
कवी असतो आशेत जगणारा 
कवी असतो जागवणारा 
कवी नसतो कधीच रागावणारा.....

कवी असतो निरंतर प्रवाह 
कवी असतो स्वच्छंद 
कवी असतो शब्दांवर प्रेम करणारा 
कवी असतो शब्दांच्या प्रेमात पडणारा...

कवी नसतो कधीच रडणारा 
कवी असतो कवितेत जगणारा 
कवी असतो सदा आशावादी 
कवींच्या कुणी नाही लागू नादी......!!

कवीत असतो आगळावेगळा भाव 
मुक्तछंद सदाही त्यांचे कवी ऐसे नांव 
कवितेच्या प्रेमात पडणे एवढेच त्याला ठावं 
कवी काय असतो....? एका कवीलाच ठावं...

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम
*महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Saturday, August 2, 2025

बदल्यांचं कशाला टेन्शन?

 बदल्यांचं कशाला टेन्शन?


बदल्यांचं कशाला टेन्शन?
आहे तिथं मस्त रहायचं...
झाल्या तर झाल्या बदल्या
हसतखेळत ज्ञानदान करायचं....!!

होईल तेंव्हा होईल बदली
सदा तत्पर आणि तयार रहायचं
कुठेही सेवाच करायची आहे ना
मग ऑर्डर येईपर्यंत सेवाच करायचं....!!

शासनाचे धोरण वेगवेगळी
आपण कशाला मधात पडायचं
ज्याचं नडलं त्याने मग 
हळूच कोर्टात जायचं.....!!

आपण खरंच नशिबवान आहोत
पुण्याचं कामं सदा करायचं
आलाच वाट्याला जर का संघर्ष
धैर्याने त्याला सामोरं जायचं....!!

आज नाही तर उद्या होतीलच बदल्या
त्याचं टेन्शन आतापासून नाही घ्यायचं
खरं सुख विद्यार्थ्यांतच आहे ना
तिथेच आणि त्यांच्यातच रमायचं...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
 कोकलगाव

सोडू नये निती (अभंग क्र.५६)

 *सोडू नये निती(अभंग क्र.५६)*

कधी माणसाने | सोडू नये निती |
लोकांस प्रचिती | असतेच || १||

वंशावळ खोटी| खोटेची करिती |
जगा दाखविती | मोठेपण || २ ||

जग हे शहाणे | ओळखती सारे |
हव्यासाचे वारे | सुटलेले || ३||

शहाण्याला असे | शब्दांचा मार |
मुर्खाचा बाजार | मांडलासी || ४ ||

काय तुझी निती | केलास कचरा |
माणूस ना बरा | दिसलासी || ५ ||

आपुल्या हाताने | दगड घातला |
मनात सलला | आंतरीक || ६ ||

खोटेपण दिसे | लोकं ही हुशार|
मानवा लाचार | का झालास || ७ ||

अतिहव्यासाचे | रे दुष्परिणाम |
करी घामाघाम | निर्लज्जास || ८ ||

सत्याचे हे सार | सत्य जिंकतसे
नाही लपतसे | खोटेपण || ९ ||

केवढी फजिती | गध्याची होतसे |
लालसा दिसते | गाढवाला || ९ ||

गाढवास काय | गुळाची ती चव |
नाही काय भेव | आंतरिचे || २० ||

तुझे मन ग्वाही | तूच आहे चोर |
परि शिरजोर | ठरलासी || ११ ||

एकदिन ऐसा | उगवेल खास|
सत्याचीच आस | दिसेलगा || १३||

नियतीचा खेळ | आज ना उद्याला |
साथ दे न्यायाला | राहशील || १४ ||

जैसी रे करणी | वैसी रे भरणी |
डोळा येई पाणी | कळेलच || १५ ||

शब्दांचा हा मार | मुर्खास कळेना |
वळता वळेना | बुध्दीलाही || १६ ||

मिनू म्हणे आता | हो बाई सावध |
सत्याचा गे वध | होत असे || १७||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम...

Sunday, June 29, 2025

माय मराठी (कविता)

 *माय मराठी*


संस्कृतीचा ठेवा 
माय मराठी
संताची भूमी
माय मराठी.....!!

लोककलेचा आत्मा
महाराष्ट्राची मराठी
दरीखो-यात नाद
घुमतोय मराठी.....!!

माय मराठी
गोड अमृतवाणी
आईची अंगाई
वासुदेवाची गाणी....!!

अमृताची धार
माय मराठी
जीवनाचे सार
गीत-झंकार मराठी....!!

मावळ्यांची हाक मराठी
शिवबाचा जयघोष मराठी
साहित्याचा अनमोल ठेवा
माझी माय मराठी......!!

अटकेपार फडकवला
झेंडा मराठी
जगात दर्जा
अभिजात मराठी......!!

माणसाची आर्त हाक
माय मराठी
दुधावरची घट्ट साय
माझी माय मराठी.......!!

जगात भाषेची शान
माय मराठी
कर्तृत्वाची खाण
माय मराठी......!!

२७ फेब्रुवारी
मराठीदिन साजरा करू
अस्तित्व मराठीचे
दूरदेशी पेरू.......!!

लावण्याची खाणं मराठी
साहित्याचा प्राण मराठी
नामदेव तुका,ज्ञानोबाची
अभंग,गाथा,गीता मराठी...!!

पु.ल.चा जीव मराठी
माडगूळकरांची शान मराठी
पुणेकरांचा सन्मान मराठी
महाराष्ट्राची जाण मराठी....!!

बहिणाबाई, जनाबाईची
ओवी दान मराठी
जिजाऊ,साऊची
महान मराठी......!!

कवितेत माझ्या
प्रकटते मराठी
शब्दांशब्दांत माझ्या
उमटते मराठी......!!

अमृताची धार मराठी
दुश्मनावर तलवार मराठी
शब्दांशब्दात सौंदर्य
भरदार, जोरदार मराठी....!!

कथा,कविता,कादंबरी,
ललित,लेख, अभंगवाणी
लावणी,शृंगार जगात
प्रसिद्ध मराठीची गोड गाणी...!!

मिळावा जगी लौकिक
अभिजात दर्जा मराठी
नसानसांत भिनलाय
दरीखो-यात गर्जा मराठी.....!!

माय मराठी तुझा
मला अभिमान आहे
बोल कौतुके मराठीचे
गुणगान कवितेतून वाहे....!!

सर्व भाषेहून श्रेष्ठ
माझी मराठी सजली
गोड अमृताच्या वर्षावात
सारी दुनिया भिजली....!!

मुकुंदराज,म्हाइंभटांचा थोर वारसा
पु.ल.कुसुमाग्रजांचा उमटला ठसा
भटांची गझल न बहिणाबाईची गाणी
मराठी आमुच्या सदैव जीवनी....!!

अभिजात दर्जा मिळावा
हीच कामना ह्रृदयातूनी
करीते विनवणी माझ्या
आज प्रत्येक शब्दांशब्दांतूनी....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...